पाचोऱ्याचे वार्ताहर, नेवासा:
शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी अद्याप मिळाली नसल्याने नेवासा न्यायालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात शेतकरी संघटनेने याचिका दाखल केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक महिने उलटून गेले तरीदेखील सरकारने कोणतीही ठोस कृती केली नाही. या मुद्द्यावर नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही.
अखेर न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. यात शेतमालाच्या बाजारभावात सातत्याने होणारी घसरण, नुकसान आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल अधोरेखित करण्यात आले आहेत.
या याचिकेमध्ये अन्नदात्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
